अनुभव + अध्यात्म = अनुभूती
जन्माला आलोय म्हणून जगणं आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी, मिळालेला जन्म सार्थकी लागेल अशा उद्दिष्टासाठी जगणं यात फरक असतो. मी देखील एक सामान्य आयुष्यच जगत होतो, शिकलो – नोकरी केली – लग्न केले – कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत रोजचा दिवस फक्त जगायचे म्हणून जगत होतो. पण कुठे तरी एक ध्यास होता म्हणून उपासना व ध्यान देखील करत होतो कि कधीतरी “तो” प्रकाश मला आतून उजळून टाकेल.
इयत्ता १० वी पासूनच काम सुरु केले होते, वेल्डर म्हणून, मग पेपर टाकणे, दुध टाकणे, मित्राच्या भाजीच्या गाडीवर मदत करणे, धाब्यावर म्यानेजर म्हणून तर कधी औषधाच्या दुकानात, पदवी पूर्ण होई पर्यंत तर बऱ्याच ठिकाणी काम केले – अगदी क्रेडीट कार्ड सुद्धा विकली. तसा मी एक साधा सायन्स ग्राज्युऐट, पुढे मग MBA आणि PGDBM करून हॉस्पिटल इंडस्ट्री मध्ये गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या पोझिशन वरती काम करतो आहे. गाव खेड्यामध्ये हेल्थ चेक-अप कॅम्प करणे, अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवणे, अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी मदत मिळवून देता येतीये का ते पाहणे या गोष्टी तर ओघानेच मी करत होतो – आहे. अनुभव.
लहानपणापासूनच घरातील वातावरण अध्यात्मिक असल्यामुळे आणि वडील हे श्री गुरुदेव दत्तात्रेयाचे निस्सीम भक्त असल्यामुळे निरनिराळ्या धार्मिक स्थळी भेटी झाल्या, विविध साधू संतांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले, त्यामुळे कुठेतरी आतून अशी फार इच्छा होती कि आपली अभ्यात्मिक प्रगती देखील छान व्हावी. उपासना, ध्यान या गोष्टी चालूच होत्या परंतु “शक्ती” काही जागृत होत नव्हती अजून, आणि एक दिवस अशी वेळ आली कि मला व्यवसायात काही लाखांचे नुकसान झाले.. घर, कार, बुलेट सगळे विकावे लागले, जे स्वतः मोठ्या कष्टाने उभे केले होते ते सर्व विकून पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार होती .. २०१२ चा तो काळ, निराश होऊन मी गिरनार येथे दर्शनासाठी गेलो जिथे आदेश मिळाला कि गुरुदेव श्री नारायणकाका महाराजांच्या चरणी जा आणि दिक्षा घे. पुण्याला आल्या आल्या महाराजांचे दर्शन घेतले, लवकरच शक्तीपाताची दिक्षा घेतली, “प्रकाश” दिसला.. दत्त गुरूंची उपासना त्यांच्या मार्गावरच घेऊन गेली. मनोबळ इतके वाढले कि जितके गमावले, आज त्याच्या कितीतरी पट पुन्हा कमावले आहे. अध्यात्म.
शाळकरी वयापासून जगलेला संघर्ष, अचानक आलेले भयंकर संकट आणि साधनेमुळे पुन्हा मिळालेली उभारी... तेव्हापासून असे वाटू लागले कि आपण देखील अडचणीमध्ये असलेल्या लोकांना योग्य वेळी योग्य असा मार्ग दाखवला पाहिजे. जे मी शिकलो आणि आजही शिकतोच आहे ते ज्योतिषशास्त्र, tarot कार्ड, रून स्टोन किंवा अंकशास्त्र हि सगळी फक्त एक माध्यम आहेत.. प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, एक अंदाज घेण्यासाठी, योग्य दिशा ठरवण्यासाठी.. परंतु त्या सोबत साधनेचे सामर्थ्य असेल तर मिळणारे परिणाम खूपच चांगले असतात. अनुभूती.
माणसाचे कर्तुत्व, कर्म किंवा प्रयत्न हे ९९ टक्के असतात आणि फक्त एक टक्का असतो देव किंवा दैवाचा... मी फक्त तुमच्या कर्तुत्वाला देव किंवा दैवाची जोड देण्याचा प्रयत्न करतो आहे..